गेल्या रविवारी सवयी प्रमाणे नविन महिन्याची खरेदी म्हणुन दोन नविन पुस्तकं घेतली.
एक म्हणजे अरुणाचल प्रदेशचे पहिले गव्हर्नर श्री प्रधान ह्यांनी लिहिलेलं "Dragon's Shadow Over Arunachal" हे पुस्तक घेतलं.
एक दिवस सहज विचार करता-करता लक्षात आलं की भारतात गेल्या काही वर्षात बऱ्यापैकी फिरलो असलो तरी एका भागात मी अजिबात गेलो नाही तो म्हणजे ईशान्य भारत.. आसाम, मेघालय, अरुणाचल, ई... खरं म्हणजे ह्या भागाची जास्ती माहिती पण नाही.. अरुणाचलचा प्रश्न ऐकुन माहिती होता... पुस्तक दिसलं तेव्हा म्हटलं.. चला.. घेऊन टाकु.. तितकीच जरा जास्ती माहिती होईल..
भीती एकच आहे.. की आधी घेतलेल्या आणि न वाचलेल्या किंवा अपूर्ण वाचलेल्या पुस्तकांमधे हे पण नको जायला.. असो!
दुसरं पुस्तक घेतलं ते म्हणजे अजित हरीसिंघानी ह्यांचं "
One Life To Ride".
अजित हे पुण्यात राहणारे एक स्पीच थेरपिस्ट.. सुमारे ४.५ वर्षांपूर्वी जून-जुलै २००४ साली त्यांनी पुणे ते लेह, आणि तिथुन पुढे खारडुंगला, श्रीनगर आणि शेवटी जम्मु अशी फक्त ४३०० कि.मी. ची ट्रिप त्यांच्या लाडक्या एनफिल्ड मोटरसायकलवरुन एकट्यानी केली!! तेव्हा त्यांच वय होतं फक्त ५४ वर्षांचं!!
रविवारी पुस्तक वाचायला सुरु केलं... आणि त्यांचं प्रवास वर्णन वाचताना मलाच खूप जास्ती excitement, उत्कंठा होत होती.. बऱ्याच दिवसांनी एखादं पुस्तक मला पहिल्या वाचनात (sitting) संपवावंसं वाटत होतं.. शेवटी ते तीन दिवसात संपवलं ती वेगळी गोष्ट..
एकट्यानी प्रवास करताना भेटलेले वेगवेगळे लोकं.. मनात आलेले चित्र-विचित्र विचार.. कधी वाटलेली भीती.. कितीतरी वेळा होणारा आनंद..लडाख ह्या अतिसुंदर प्रदेशाचं वर्णन... आणि मीना ह्या स्वत:च्या मोटारसायकलीवरचं जीवापाड प्रेम..
खरं म्हणजे अगदी साध्या सोप्या स्टाईल मधे लिहिलं आहे त्यांनी पुस्तक.. खूप भन्नाट असं काही नाही.. पण जे घडलं, जे डोक्यात आलं.. ते मस्त प्रामाणिकपणे लिहिलं आहे..
पुस्तक वाचताना मलाच खूप गोष्टी आठवल्या..
शंतनुनी मागच्या वर्षी केलेली लडाखची सायक्लिंग ट्रिप... गेल्या वर्षी जुलै की ऑगस्ट मधे गेला होता तो.. मे महिन्यात टेकडीवर भेटलेला तेव्हा तयारी चालु होती त्याची..
त्या ट्रिपचे फोटो मी आता कधीतरी इतक्यातच पाहिले.. एकदम भारी वाटलं ते फोटो पाहुन..
आणि काल परत टीव्हीवर चार युरोपियन मित्रांची लडाखचीच सायक्लिंग ट्रिप दाखवत होते, ते बघितलं..
मनात आलं ह्या ठिकाणी जायलाच पाहिजे आपण.. ते सुद्धा सायकल वर.. लगेच गुगलवर शोधलं.. तेव्हा हे सापडलं..
http://www.sunholidays.co.in/biking/manali-to-leh-on-cycle.html
मनाली ते लेह हा ४७५ कि.मी.चा रस्ता आहे.. जगातल्या सर्वाधिक उंच अशा रस्त्यांपैकी एक..
अवघड दिसतय सॉलिड.. खरं म्हणजे डॉन स्टाईलमधे म्हणायचं झालं, तर मनाली ते लेह ही सायक्लिंग ट्रिप, मुश्किल ही नही, नामुमकिन हैं...
म्हणजे माझ्या करता.. ओर्कुटच्या भाषेत बोलायचं तर मी म्हणजे 'a few extra pounds'... आणि शंतनु किंवा ते चौघं युरोपियन लोकं म्हणजे 'athletic build' किंव 'slim build'... आणि मी मुळात आळशी... ह्या ट्रिपच्या आधी लागणारी ट्रेनिंग, प्रॅक्टिस.. discipline, rigour... आमच्या राजेशाही आळसाला कसं चालणार, माहित नाही..
म्हणजे गेल्या वर्षी शंतनुनी स्वत: ३-४ महिने ट्रेनींग केलेलं.. शिवाय तो नेहमी ट्रेकिंग करणारा आहे... एव्हरेस्ट बेस कॅम्पचा अवघड ट्रेक करुन आला आहे.. मागच्याच वीकेंडला पुण्यात झालेल्या Enduro3 ह्या adventure रेस मधे त्याला पहिलं बक्षिस देखिल मिळालं... हे सगळं नोकरी बरोबर कसं काय करतो, गंमत आहे.. म्हणजे Enduro3 संपवुन साहेब दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या कामा निमित्त USला गेले लगेच!
तो परत आला की त्याला भेटुन विचारायचं आहे... म्हणजे मग सायक्लिंग ट्रिपची तयारी सुरु करता येईल! :)
शेवटी मुश्किल किंवा नामुमकिन आता पासुनच का म्हणायचं?
अजितनी त्यांच्या पुस्तकात JRD Tata ह्यांचं एक वक्तव्य लिहिलं आहे,
"Friends who tell me it is ridiculous and foolhardy for an octogenarian to ski, fly a plane or drive fast cars, do not understand the thrill and sense of self-fulfillment obtained from living a little dangerously".
वयाची ऐंशी उलटलेल्या टाटांनी विमान चालवलेलं तेव्हा मित्रांनी वेड्यात काढलेलं त्यांना.. पण शेवटी थोडंसं dangerous जगण्यातच जे थ्रिल आहे, जी मजा आहे... ती त्या मित्रांना कशी कळणार...
आमचं तर तीस हे गोजिरवाणं वय!! प्रयत्न करायला तरी काहीच हरकत नाही!!
बचेंगे तो और भी लढेंगे!!
पुस्तक वाचताना, माझ्या आणि DJच्या VoF ट्रिपची पण आठवण झाली... ट्रिप बद्दल तर मी आधी लिहिलेलं आहेच.. शेवटच्या दोन दिवसांबद्दल लिहायचं राहिलेलं.. तो लिहायाचा एन्थु आला.. म्हणुन मग आता तेच लिहुन टाकतो..
VoF ट्रिप: Final Part
दिवस ६: गुरुवार, २८/८/०८
घांगरिया -> गोविंदघाट -> जोशीमठ -> पिपलकोटी -> चमोली -> श्रीनगर
पहाटे उठलो तेव्हा आमचा आम्हालाच विश्वास बसत नव्हता. इतकी सुंदर फुलों की घाटी पाहिलेली.. हेमकुंडचा ट्रेक केलेला.. पाऊस आणि थंडीचा खरं म्हणजे जबरदस्त कंटाळा आलेला.. दुसरं म्हणजे रविवार पासुन जगाशी संपर्कच तुटला होता.. फोन, न्युज, इंटरनेट, ई-मेल, वीज... ह्यापासुन वंचित राहिलेलो.. एका अर्थी चांगलं, पण तरी आपल्याला इतकी सवय झाली असते ह्या सगळ्यांची...
आम्ही गोविंदघाटहून सोमवारी आलेलो, तेव्हाच्या राजिंदर कूलीनी आम्हाला दुसरा एक कूली आणुन दिला.. नेपाळी होता.. बहादुर नाव होतं कदाचित.. पायात काळे प्लॅस्टिकचे पावसाळी बूट.. चेहऱ्यावर सुरकुत्या.. बारीक डोळे.. डोक्यावर टोपी.. अंगात स्वेटर.. आणि पाठीवर वेताची ती बास्केट.. बास्केट मधे आमच्या दोघांच्या बॅग्स टाकुन, साहेब खाली उतरायला तयार..
सकाळचे ६-६.१५ वाजलेले.. शेवटचं एकदा घांघरिया पोटभर पाहिलेलं.. त्याच्या आजुबाजुचे ते पहाड पुन्हा एकदा डोळे भरुन पाहिलेले.. DJ फोटो काढत-काढत खाली उतरत होता.. आणि बहादुरच्या पायात चाकं बसवलेली.. म्हणुन मग मी त्याच्या बरोबर रहायचा प्रयत्न केला.. अशक्य माणुस होता हा!!! पाठीवर वजन असुन, इतक्या चपळाईने उतरत होता.. उतरताना, बऱ्याच ठिकाणी लांब रस्त्या ऐवजी जर एखादं steep शॉर्ट-कट रस्ता असेल, तर तो त्या रस्त्यानी उतरायचा.. मी एक-दोन ठिकाणी त्यानी घेतलेला शॉर्ट-कट घेतलेला, आणि फाटलेली माझी!! गेल्या दोन-चार दिवसात पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी निसरडं झालेलं.. पण तो अत्यंत सफाईने उतरत होता.. अगदी तुरु-तुरु म्हणतात तसं!
DJला सांगीतलेलं की मधे रस्त्यात एका ठिकाणी भेटु.. १३ कि.मी. उतरायचं... जितकं जमेल, तेवढं बरोबर उतरलेलं बरं.. तसं त्याच्या बरोबर आम्हाला आदल्या दिवशी हेमकुंडला जाताना भेटलेला मुंबईचाच एक शीख माणुस होता... आणि माझ्या बरोबर बहादुर.. खरं म्हणजे बहादुर बरोबर मी!!
पण बहादुरच्या स्पीड पुढे मी हात टेकले!
पहिले तीन कि.मी. आम्ही निव्वळ अर्ध्या तासात उतरलेलो.. शेजारुन वाहणारी लक्ष्मणगंगा ओलांडायला तिथे एक छोटा पूल आहे.. आणि नदीच्या शेजारी एक छोटा ढाबा आहे.. DJला तिथे भेटायचं ठरलं होतं... म्हणुन मग मी आणि बहादुर तिथे थांबलो.. सकाळचे ६.४५-७ वाजत आले होते.. बहादुरनी पाठीवरची त्याची बास्केट खाली ठेवली.. दोन्ही पाय दुमडुन, तो बसला.. विडी पेटवली आणि वाट बघत बसला.. मी त्या खळखळणाऱ्या पाण्याच्या बाजुच्या मोठ्या दगडावर बसलो.. समोर एक राखाडी-ब्रॉऊन रंगाची अतिशय सुंदर पक्षांची जोडी त्या सकाळच्या गारव्या मधे छानपैकी पकडापकडी खेळत होती.. ती इकडुन, तिकडे अशी सारखी तिची जागा बदलत होती.. आणि तो तिच्या मागे तिला मनवायला बघत होता.. का पक्षां मधे उलटं असतं.. तो उडत होता इकडे-तिकडे.. आणि ती त्याचा पाठलाग करत होती.. माहित नाही.. त्यांचा खेळ पाहुन खूप खूष झालो, हे मात्र खरं!
स्वत:च्या लहरीत वाहणारी ती गार वाऱ्याची झुळुक.. तिच्या नखऱ्यावर सळसळणारी ती झाडांची पानं.. अतिशय वेगानी वाहणाऱ्या पाण्याच्या कडेला उभे राहिलेले ते मोठ-मोठे पांढरे खडक.. आणि ह्या सगळ्यांना शांत करणारा पाण्याचा तो आवाज (deafening roar)..
डोळे बंद करुन.. i tried to soak in everything, as much as i could.. इतकं शांत.. इतकं रम्य.. the heart lost in its own dreamy world..
हवा का झोंका हैं या तुम्हारे बदन की खुशबू
यह पत्तीयों की हैं सरसराहट के तुमने चुपके से कुछ कहा हैं
यह सोचता हूँ मैं कब से गुमसुम
के जब की मुझको भी यह खबर हैं
के तुम नहीं हो, कहीं नहीं हो
मगर यह दिल हैं के कह रहा हैं
के तुम यहीं हो, यहीं कहीं हो...
DJ आणि सरदारजी आले, तेव्हा मी आणि बहादुर पण निघालो.. ६-७ कि.मी. अंतर कापल्यावर एका ढाब्यावर आम्ही दोघं नाश्त्या करता थांबलो.. दौलत ढाबा.. पुण्यातल्या दौलत ढाब्याची आठवण आलेली..
ढाब्याचा मालक दौलत सिंह.. सॉलिड गप्पा मारणारा माणुस.. ही मंडळी मस्त मस्त गोष्टी सांगतात.. आलु पराठा बरोबर अमुल बटर, आणि फक्कड चहा.. ह्या बरोबर दौलत सिंह आम्हाला गोष्टी सांगत होता.. कोणा एका सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा इथे ट्रेकिंग करताना मरण पावला.. वादीच्या बर्फात त्याचं शव देखिल सापडत नव्हत म्हणुन त्या अधिकाऱ्यानी हेमकुंडला मन्नत मागितली.. आणि शेवटी त्या मुलाचं शव सापडलं.. ही पहिली गोष्ट... त्याचा हवा तो dramatic effect मिळाल्यावर मग.. कोणाला मूल होत नव्हतं.. इथे येऊन हेमकुंड मधे स्नान केलं.. आणि मग मूल प्राप्त झालं (इतके दिवस मूल कसं प्राप्त होतं.. ही माझी कॉन्सेप्ट किती गंडलेली होती..)..इतर असे किस्से त्यानी सांगितले..
दौलत सिंह खाली जोशीमठ मधे राहणारा.. वर्षातले जून ते सप्टेंबर असे ३-४ महिनेच लोकं इथे येतात.. तेवढे ३-४ महिनेच तो इकडे राहतो.. मग ह्या ढाब्याचं काय करतो, विचारल्यावर त्यानी सांगितलं...
ढाब्याचे ८-१० लाकडी खांब जमिनीमधे लावलेले आहेत, ते तसेच ठेवायचे.. वरचे पत्रे काढुन घ्यायचे.. भांडी-कुंडी खाली स्वत: बरोबर घेऊन जातो.. पत्रे आणि बाकीचं सामान बांधुन तिथेच एका कोपऱ्यात ठेऊन देतो.. त्या ७-८ महिन्यात इतका बर्फ असतो की ते चोरीला कोणी घेऊन जायची भीती नसते.. जूनच्या सुरुवातीला परत येऊन.. पुन्हा ढाबा उभा करतात.. आणि चूल पेटवतात..
आणि सामग्री? मॅगी, कोल्ड-ड्रिंक्स, इ. तयार वस्तु - साधारण १० हजाराचा माल - खालुन जोशीमठ मधुन credit वर घोड्यावरुन आणतो... साधरण १०-१५ दिवस पुरतं ते सामान.. मग परत खाली जाऊन आधीच्या सामानाचे पैसे देऊन नविन सामान परत उधारीवर आणतो.. दिवस चांगले असले की कधी कधी एका महिन्याच्या आतच एक-सव्वा लाखाच्या सामानाची उलाढाल होते.. तर कधी महिन्याला २०-२५ हजारच.. कधी कधी परदेशी प्रवासी येतात, ते भरभरुन पैसे देतात.. शेवटी सगळी वाहे गुरुंची कॄपा!!
दौलत सिंहचा निरोप घेऊन मी आणि बहादुर पुन्हा खाली उतरु लागलो.. उतरताना खरं म्हणजे मजा येत होती.. सहज, उड्या मारत, धावत-पळत उतरत होतो.. सूर्य उजाडलेला.. आणि त्याची किरणं धुक्यातुन समोरच्या डोंग्रांवर पडु लागलेली.. विचार यायचा की DJला सांगावं की हा फोटो काढ.. तो फोटो काढ.. waiting for him was not possible, given that Bahadur was running away as fast as he could.. शेवटी माझा मीच ते न्याहळत खाली उतरत होतो..
अशाच एका ठिकाणी ते झाड दिसलेलं.. नदीच्या पात्रात मधोमध एकटं उभं होतं.. उंचच्या उंच.. ना एखादी फांदी.. ना एखादं पान..त्याच्या पायाशी नदीचं पाणी फेसाळत येऊन आपटत होतं.. वर टोकाशी धुक्यात सोनेरी किरणांमध्ये न्हात होतं.. समोरच्या पहाडापुढे ते झाड इवलंसंच.. पण दिमाखात उभं होतं.. आणि अशा वेळेस एक काळा पक्षी येऊन त्याच्या डोक्यावर बसला.. पंख उघडुन आकाशाकडे बघत होता.. अगदी हलकं-हलकं वाटलं असेल त्याला..
i stood there mesmerised.. for the first time in my life, identifying myself with a tree..
खाली गोविंदघाटला पोचलो, तेव्हा सकाळचे ९.३० वाजलेले.. निव्वळ ३-३.१५ तासात आम्ही १३ कि.मी. उतरलेलो.. DJ पण आमच्या पाठोपाठ लगेच आला..
आता पुढे काय करायचं.. सर्व प्रथम म्हणजे एका हॉटेल मधे जाऊन गरम पाण्यानी मस्त आंघोळ केली.. एकदम छान वाटलं.. मग DJ म्हटला.. की इथुन बद्रीनाथ फक्त २२ कि.मी आहे... तर गाडी पकडु आणि तिथे जाऊन येऊ.. म्हणुन आम्ही गाडी करता थांबलो.. घांघरियाला आदल्या दिवशी संध्याकाळी खूप लोकं एकदम आलेले.. तेव्हा त्यांच्या कडुन कळलेलं की खाली रस्त्यात कुठेतरी लॅन्डस्लाईड झालली म्हणुन १-२ दिवस सगळं रखडलेलं.. त्यामुळे खाली जायच्या ऐवजी आणखिन वर बद्रीनाथला जायचं, म्हणजे रिस्क!! ती घ्यायची का नाही.. शेवटी १.०० वाजला तरी आम्हाला बद्रिनाथला जाणारी एकही गाडी मिळाली नाही.. म्हणुन देवाला तिथुनच नमस्कार करुन.. आम्ही जोशीमठची गाडी पकडली.. ह्या वेळेस जीप मधे DJला समोरची सीट मिळाली.. आणि मला एकदम मागची.. जीप असल्यामुळे मागे फक्त एक आडवं दार होतं, बिना खिडकीचं..
रस्ता अरुंद.. आणि ड्राईव्हरला त्या रस्त्याचा इंच न इंच माहित होता.. पहाडी रस्त्यावर 'right of way' नेहमी वर चढणाऱ्या गाडीचा असतो.. खाली उतरणाऱ्या गाडीनी समोरच्या गाडीला वाट द्यायची असते.. असा अलिखित नियम असतो..
तर अशा वेळेस.. आमची गाडी खाली उतरताना, समोरुन एक गाडी आली.. रस्ता अरुंद म्हणुन आमचा ड्राईव्हर आमची गाडी रिव्हर्स घ्यायला लागला.. ते सुद्धा रस्त्याच्या कडेच्या बाजुला.. जस-जसं कडा जवळ येऊ लागला, तसं मला सुमारे ४००-५०० फूट खाली वाहणारी लक्ष्मणगंगा दिसु लागली.. ती कितीही सुंदर असली तरी तिला मला भेटायची अजिबात इच्छा नव्हती.. आणि अगदी ४-५ इंच आधीच तो थांबला तेव्हा मी सुटकेचा नि:श्वास टाकला..
जोशीमठला पोचलो.. तेव्हा DJ तिकडच्या रेल्वे बुकिंग मध्ये आमचं हरिद्वार ते दिल्लीचं ट्रेनचं बुकिंग करायला गेला.. हो.. मी फक्त जायचं बुकिंग केलं होतं.. परत यायचं ऑपशन ओपन ठेवलेलं :)))
मी जोशीमठहून पुढे जाणारी सुमो/जीप कुठे मिळेल ते बघायला गेलो.. दुपारचे २-२.३० वाजत आले होते.. रात्री त्या भागात गाड्या चालवत नाहीत.. त्यामुळे अंधार पडायच्या आत आम्हाला ॠषिकेष/हरिद्वारच्या जितकं जवळ पोचता येईल, तितकं बघायचं होतं..
जोशीमठ वरुन एकही गाडी खाली जायला तयार नव्हती.. कारण मध्ये रस्त्यात पिपलकोटी ह्या गावाच्या अलिकडे लॅन्डस्लाईड झाला होता.. त्यामुळे सुमोवाला म्हट्ला.. तुम्हीच सीट्स गोळा करुन आणा.. शिवाय रेट वाढवलेला, त्यामुळे स्थानिक लोकं तयार नव्हते जास्ती भाडं द्यायला.. आता काय करा???
भगवान उपर से देख रहा था.. नेमकं तिथेच एक ५ जणांचा ट्रेकिंग ग्रुप भेटला.. तो सुद्धा मराठी!!! सगळे मुंबई-पुण्याचे!! त्यातले चौघं तिशीतले.. आणि एक २८-२९ वर्षांचा असावा.. त्याचं नाव मन्या.. म्हणजे मनिष असावं.. पण त्याला सगळे मन्या म्हणत होते.. ग्रुपचा लिडर होता जॅकी श्रॉफ.. म्हणजे जॅकी सारखा दिसायला.. डोळ्यांवर गॉगल.. लांब केस.. मिशी... अंगात ट्रॅक सुट.. आणि बोलताना "भिडु-भिडु" म्हणणारा.. "क्या भिडु.. काय करायचं.. घ्यायची का सुमो? आम्ही ५ जणं आहोत.. तुम्ही दोघं.. अख्खी गाडी बुक करु.. म्हणजे आरामात बसता येईल आपल्याला सगळ्यांना.. नाही तर तो @#$&% १० सीट्स बसवेल.. क्या बोलता हैं भिडु?"
मी लगेच तयार.. DJ पण खुष.. we had trekked @55km in three and a half days.. आम्ही इतके दमलो होतो.. की पुढचा प्रवास आम्हाला खरंच पुन्हा १० लोकांबरोबर एका सुमोमध्ये कोंबुन करायचा नव्हता...
क्रमश:
~ Earlier posts about the VoF trip are posted
herehttp://asach-aapla.blogspot.com/2008_09_01_archive.html